04 January 2007

Maharashtra state information

महाराष्ट्र mahārāṣṭra (अर्थ:महान राष्ट्र) क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे राज्य आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशाशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची किनारपट्टी आहे. मुंबई, देशातील सर्वात मोठे शहर, हे महाराष्ट्राच्या राजधानीचे शहर आहे. तर नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.

नावाचा उगम

महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये "राष्ट्र" या नावाने संबोधले गेले आहे. अशोकाच्या काळात "राष्ट्रिक" आणि नंतर "महा राष्ट्र" या नावाने ओळखले जावू लागले असे ह्युएन-त्सांग व इतर प्रवाशांच्या नोंदींवरून दिसून येते. हे नाव प्राकृत भाषेतील "महाराष्ट्री" या शब्दावरून पडले असण्याची शक्यता आहे. काही जण महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ महाररट्टा यांच्याशी लावतात परंतु काहींच्या मते हे नाव महा-कंतारा (महान वने- दंडकारण्य) या शब्दाचा अपभ्रंश आहे.

इतिहास

महाराष्ट्रातील विविध स्थळांचा-नदी,पर्वत,स्थळ इ.- रामायण महाभारत इत्यादी प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो. व्यवस्थित माहितीची उपलब्ध ऐतिहासिक साधने इ.स.पूर्व तिसर्‍या शतकापासून महाराष्ट्राची माहिती देतात.

महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचा राजकीय कालखंडानुसार इतिहास वेगळा असला तरी सांस्कृतिक व सामाजिक इतिहास बराचसा समान आहे. जनपद, मगध, मौर्य, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट, देवगिरी चे यादव, अल्ला उद्दिन खिलजी, मुहम्मद बीन तुघलक, पोर्तुगीज, विजापुर, मुघल, मराठा, हैदराबादचा निजाम, इंग्रज, इत्यादी राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे विविध भाग वेगवेगळ्या कालखंडात व्यापले होते.


मध्ययुगीन इतिहास व इस्लामी राज्य

महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्री भाषेच्या वापरामुळे ३रया शतकापासून नोंदवला गेला आहे. त्या आधीच्या कालखंडाबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही. महाराष्ट्र त्या काळात 'दंडकारण्य' म्हणून ओळखले जात असे. मगध, चालुक्य, वाकाटक, राष्ट्रकुट यांचे राज्य महाराष्ट्रावर वेगवेगळ्या मध्ययुगीन कालखंडात होते,परंतु सातवाहन, देवगीरीचे यादव व शालिवाहन यांच्या कालखंडात मराठी भाषा-संस्कृतीचा विकास झाला. मौर्य साम्राज्याच्या विघटनानंतर सातवाहन यांनी ख्रि.पू २३०- २२५ पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. सातवाहनांच्या राज्यात मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक सुधारणा झाली. महाराष्ट्री भाषा, (जी नंतर आधुनिक मराठी भाषेत रूपांतरित झाली) सातवाहनांची राजभाषा होती. इ.स ७८ रोजी महाराष्ट्राचा राज्यकर्ता गौतमीपुत्र सत्कारणी (शालिवाहन) हा होता. त्याने सुरू शालिवाहन शक आजही रूढ आहे.

त्यानंतर देवगिरीच्या यादवांनी महाराष्ट्रावर राज्य प्रस्थापीत केले.१३व्या शतकात महाराष्ट्र प्रथमच इस्लामी सत्तेखाली आला जेव्हा दिल्लीचे अलाउद्दीन खिलकी व नंतर मोहम्म्द बिन तुघलक यांनी दख्खनचे काही भाग काबीज केले. इ.स.१३४७ तुघलकांच्या पडावानंतर बिजापूरच्या बाहमनी सुल्तानांनी सुमारे १५० वर्षे राज्य केले.


मराठा व पेशवे


छत्रपती शिवाजी महाराज

१७व्या शतकाच्या सुरुवातीस (पश्चिम महाराष्ट्रातील) मराठा-साम्राज्याची मुहूर्तमेढ झाली. मराठ्यांचे नेतृत्व छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या कडे होते . शिवाजी महाराजांना इ.स.१६७४ रोजी राज्याभिषेक झाला. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज स्थापन केले.

शिवाजीराजांचे पुत्र संभाजीराजे भोसल्यांना औरंगझेब यांनी पकडले व त्यांची हत्या घडवून आणली. पुढील चार दशकात पेशव्यांनी मराठा साम्राज्य हस्तगत केले. भोसले हे केवळ नाममात्र राज्यकर्ते राहिले. मोगलांना हरवून पेशवे भारताचे नवे राज्यकर्ते म्हणून उदयास आले.बालाजी विश्वनाथ पेशवे व त्यांचे पुत्र बाजीराव-१ यांनी मराठा राज्य वाढवले.

इ.स. १७६१ साली पानिपतच्या तिसरया लढाईत अफगाण सेनानी अहमदशाह अब्दालींनी पेशव्यांचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याची एकसंधता नष्ट झाली व अनेक स्थानिक राज्यात विभागणी झाली.


ब्रिटिश राज्य व स्वातंत्र्योत्तर काळ

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात बस्तान घातले असताना मराठे व ब्रिटिश यांच्यात इ.स.१७७७-१८१८ च्या दरम्यान तीन युध्दे झाली. इ.स.१८१९ रोजी ब्रिटिशांनी मराठ्यांचे राज्य काबीज केले. महाराष्ट्र ब्रिटिशांच्या बॉम्बे राज्याचा एक भाग होता. बॉम्बे राज्यात कराची ते उत्तर दख्खन भाग समाविष्ट होते. अनेक राज्यकर्ते ब्रिटिशांचे वर्चस्व मानून आपाआपले राज्य संभाळीत होते. मराठवाडा निझामाच्या अंमालाखाली राहिला. ब्रिटिशांना सामाजिक सुधारणा तसेच अनेक नागरी सोयी-सुविधा आणल्या. परंतु त्यांच्या भेदभावी-निर्णयांमुळे व पारतंत्र्याच्या जाणिवेमुळे भारतीयांमध्ये असंतोष निर्माण झाला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस लोकमान्य टिळक या नेत्यानी ब्रिटिशांविरुध्द लढा उगारला जो पुढे महात्मा गांधी यांनी चालवला. मुंबई येथे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे एक महत्वाचे केंद होते.


महाराष्ट्र राज्याची निर्मिती

या विषयाचा विस्तृत लेख संयुक्त महाराष्ट्र चळवळ

भारताला इ.स.१९४७ रोजी स्वातंत्र्य लाभले.भारताच्या स्वातंत्र्यानंतर भाषेप्रमाणे प्रांत निर्मिले जात होते. परंतु भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. केंद्राच्या या पवित्र्यावरुन मराठी-जनात क्षोभ उसळला. अखेर १०५ जणांच्या बलिदानानंतर, १ मे १९६० ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याचा मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली.१९६० च्या दशकातील संयुक्त महाराष्ट्र चळवळीने महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक भागास एकत्र आणले.

भौगोलिक स्थान


महाराष्ट्रातील पर्वत

महाराष्ट्र भारतीय उपखंडाच्या उत्तर-मध्य दिशेला स्थित आहे. महाराष्ट्राची जमीन प्राकृतिकदृष्ट्या एकसारखी (homogeneous) आहे व खूप मोठे क्षेत्र (महाराष्ट्र देश) पठारी आहे. डेक्कन वा दख्खन असे या पठारांना संबोधले जाते. दख्खनपठारी प्रदेश विविध नद्यांनी व्यापलेला आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेला व अरबी समुद्राच्या समांतर सह्याद्री पर्वतरांगा (किंवा पश्चिम घाट) आहेत ज्यांची उंची सुमारे २१३४ मि. (७००० फुट) आहे. या पर्वतरांगातून गोदावरी, नर्मदा आणि कृष्णा सह अनेक नद्या उगम पावतात. अरबी समुद्राच्या व सह्याद्री पर्वतरांगाच्या मध्ये असलेल्या भागास कोकण म्हणतात. कोकण भागाची रुंदी ५०-८० कि.मी आहे. राज्याच्या उत्तरेस सातपुडा तर पुर्वेस भामरागड-चिरोळी-गायखुरी पर्वतरांगा आहेत. राज्यात मान्सून पाऊस पडतो. महाराष्ट्रातील काळी बेसाल्ट मृदा कापसाच्या लागवडीसाठी उपयुक्त आहे.


प्रशासन


मंत्रालय:महाराष्ट्र राज्य

भारतातील इतर राज्यांप्रमाणेच, राज्याचा प्रमुख राज्यपाल ही व्यक्ती असते जी केंद्र सरकारने नेमून दिलेली असते. राज्यपाल हे पद केवळ नाममात्र असते. मुख्यमंत्री , राज्य सरकारचा प्रमुख, या व्यक्तीकडे सर्वाधिक अधिकार असतात. महाराष्ट्राची राजधानी, मुंबई असून येथे विधान सभा व मंत्रालय स्थित आहे. मंत्रालयात राज्य सरकारची प्रशासकीय कार्यालये आहेत. मुंबई उच्च न्यायालय याच शहरात आहे. राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे तर हिवाळी अधिवेशन नागपूर (महाराष्ट्राची उपराजधानी) येथे होते.

महाराष्ट्रात दोन विधान-सदने आहेत. विधान सभेत लोकांनी प्रत्यक्षपणे निवडून दिलेले प्रतिनिधी असतात तर विधान परिषदेत मात्र अप्रत्यक्षरीत्या नियुक्त प्रतिनिधी असतात. महाराष्ट्राचे राज्य सभेत १९ प्रतिनिधी तर लोक सभेत ४८ प्रतिनिधी असतात. भारताच्या स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय इतिहास मुख्यत: कॉंग्रेस पक्षाचा आहे. यशवंतराव चव्हाण, शरद पवार या काही महत्वाच्या कॉंग्रेस नेत्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भुषविलेले आहे. परंतु १९९५ साली शिवसेना-भाजपा युतीने सत्ता काबीज केली. कॉंग्रेस पक्षातील फुटीनंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस हा नवा पक्ष बनवला. आज महाराष्ट्रात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस युतीची सत्ता असली तरी सर्वात मोठा पक्ष राष्ट्रवादी हा आहे. विलासराव देशमूख हे मुख्यमंत्री तर आर.आर.पाटील हे उप-मुख्यमंत्री आहेत.


विभाग


महाराष्ट्र राज्याचे विभाग

महाराष्ट्र राज्य ३५ जिल्ह्यात विभागले गेले आहे. या जिल्ह्यांचे ६ समूह अथवा विभाग आहेत- औरंगाबाद, अमरावती, कोंकण, नागपूर, नाशिक व पुणे. हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत राजस्व विभाग आहेत.

भौगोलिक, ऐतिहासिक व राजकीय-मतांनुसार महाराष्ट्रात पाच मुख्य विभाग आहेत: विदर्भ किवा बेरार (नागपूर आणि अमरावती विभाग), मराठवाडा (औरंगाबाद विभाग), खानदेश व उत्तर महाराष्ट्र विभाग (नाशिक विभाग), देश किंवा पश्चिम महाराष्ट्र विभाग (पुणे विभाग) आणि कोंकण (कोंकण विभाग).


महाराष्ट्राच्या रहिवाशांना महाराष्ट्रीय अथवा मराठी माणूस असे संबोधतात. २००१च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ९,६७,५२,२४७ आहे. महाराष्ट्र लोकसंख्येनुसार भारतातील दुस-या क्रमांकाचे राज्य आहे. मराठी बोलणा-यांची संख्या ६२,४८१,६८१ आहे. महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणारे केवळ ११ देश आहेत. लोकसंख्येची घनता ३२२.५/१ कि.मी. इतकी आहे. लोकसंख्येपैकी ५.०३ कोटी पुरुष व ४.६४ कोटी स्त्रिया आहेत. महाराष्ट्राचे शहरी लोकसंख्येची टक्केवारी ४२.४% आहे. लिंग-गुणोत्तर (sex-ratio) १,००० पुरुषांमागे ९२२ महिला इतका आहे. ७७.२७% (पु-८६.२%, स्त्रि-६७.५%) लोकसंख्या साक्षर आहे. साक्षरता-वाढीचा दर १९९१-२००१ला २२.५७% होता.

मराठी ही महराष्ट्राची अधिकृत भाषा आहे. त्याचबरोबर हिंदीइंग्रजी शहरी भागात बोलली जाते. उत्तर-पश्चिम महाराष्ट्रात अहिराणी तर दक्षिण कोंकणात मालवणी या मराठीच्या बोलीभाषा बोलल्या जातात. दख्खनच्या देश भागात 'देशी' व विदर्भात 'व-हाडी' या बोलीभाषा अस्तित्वात आहेत.

राज्यात ८०.२% हिंदू, १०.६% मुस्लिम, ६% बौद्ध , १.३% जैन व १% ख्रिश्चन धर्मीय जनता आहे. काही प्रमाणार ज्यू व पारशी धर्मीय देखिल आहेत.


अर्थव्यवस्था

पुढील तक्ता राज्याच्या वार्षिक उत्पन्नचा आहे. स्त्रोत सांख्यिकी मंत्रालय,भारत सरकार (आकडे- कोटी रु.)

वर्ष वार्षिक उत्पन्न
१९८० १६,६३१
१९८५ २९,६१६
१९९० ६४,४३३
१९९५ १,५७,८१८
२००० २,३८,६७२

७०च्या दशकातील योग्य आर्थिक धोरणांमुळे महाराष्ट्र भारतातील अग्रगण्य औद्योगिक राज्य बनला. परंतु महाराष्ट्रात विकास सारख्याप्रमाणात होऊ शकला नाही. मुंबईसह पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला पण विदर्भ, मराठवाडा व कोंकण हे भाग मागास राहिले. महाराष्ट्रातील राजकारणात व नोकरशाहीतही प.महाराष्ट्राचा अधिक प्रभाव आहे. विदर्भात असंतोष असून तेथील राजकारणी कधी कधी वेगळ्या राज्याची मागणी करतात.

राज्याचे २००४ सालचे वार्षिक उत्पन्न (gross state domestic product) $१०६ बिलियन आहे. महाराष्ट्र भारतातील दुसरा सर्वात जास्त शहरीकरण झालेले राज्य आहे.

महाराष्ट्र भारतातील अग्रगण्य औद्योगिक राज्य असून एकूण राष्ट्रीय औद्योगिक उत्पन्नापैकी १३% इतका राज्याचा हिस्सा आहे. ६४.१४% लोक कृषी व संबंधित उद्योगात रोजगार मिळवतात. एकूण वार्षिक उत्पन्नापैकी (GSDP) ४६% हिस्सा हा कृषी व संबंधित उद्योगातुन मिळतो.

  • महाराष्ट्रातील प्रमुख उद्योदधंदे- रासायनिक आणि संबंधित उत्पादने, विद्युत आणि साधी यंत्रे, कापड, पेट्रोलीयम आणि तत्सम उद्योग हे आहेत.
  • इतर महत्वाचे उद्योदधंदे- धातु उत्पादने, वाईन, दागिने, औषधे, अभियांत्रिकी सामान,यांत्रिक सामान, पोलाद व लोह उद्योग, प्लास्टिक वायर्स
  • महत्वाची पीके- आंबे, द्राक्षे, केळी, संत्री, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि कडधान्ये.
  • महत्वाची रोख पीके (cash crops)- शेंगदाणे, कापूस, ऊस, हळकुंद व तंबाखू.

सिंचीत जमीन ३३,५०० कि.मी2 इतकी आहे.

मुंबई, महाराष्ट्राची राजधानी, भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. जवळजवळ सर्व प्रमुख बॅका, आर्थिक संस्था, विमा संस्था व गुंतवणूक संस्थांचे मुख्य कार्यालये येथे आहेत. बॉलिवूड या हिंदी चित्रसृष्टीचे व मराठी दुरचित्रवाणी व चित्रपटांचे केंद्र मुंबईत आहे. मुंबई शेयर बाजार (भारतातील सर्वात मोठा व आशियातील सर्वात जुना) ही महत्वाची संस्था मुंबईत आहे. महाराष्ट्र सरकारने सॉफ्टवेयर पार्क पुणे, मुंबई, नागपूर व नाशिक येथे स्थापन केले आहेत.

कोळसानिर्मित व अणुनिर्मित वीज या क्षेत्रात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे. जट्रोफा लागवडीसाठी महाराष्ट्राने नवा प्रयोग सुरु केला आहे.४१% पेक्षा S&P CNX 500 कंपन्यांचे महाराष्ट्रात कार्यालये आहेत.


संस्कृती

महाराष्ट्रातील काही मंदीरे शतकाहुन जुनी आहेत. मंदीरांच्या शिल्पशैलीत उत्तर व दक्षिण भारताचा मिलाप आढळतो. मंदीरांवर हिंदू, बौद्ध व जैन संस्कृतींचा ठसा आहे. औरंगाबाद जवळील अजिठा व एलोरा लेणी जगप्रसिध्द आहेत. मोगल शिल्पशैलीची झलक औरंगाबाद येथीलच बीबी का मकबरा येथे पहायला मिळेल. महाराष्ट्रात अनेक दुर्ग व किल्ले आहेत. रायगड, प्रतापगड व सिंधुदुर्ग ही काही उदाहरणे.

महाराष्ट्राचे लोकसंगीत समृध्द आहे. गोंधळ, लावणी, भारुड आणि पोवाडा हे प्रकार विशेष लोकप्रिय आहेत. मराठी साहित्य भारतातील अग्रगण्य असे असून ज्ञानेश्वर (भावार्थदिपीका अर्थात ज्ञानेश्वरी चे रचेते), पु.ल. देशपांडॆ, प्र.के.अत्रे, व्यंकटेश माडगुळकर हे काही प्रमुख लेखक व कवी आहेत. प्रत्येक वर्षी अनेक मराठी पुस्तके प्रकाशीत होत असतात.मराठी नाटक, चित्रपट व दुरचित्रवाणीचे केंद्र मुंबई येथे आहे आणि बहुतेक कलाकार सर्व माध्यमातून कामे करतात. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द व्यक्ति- पु.ल.देशपांडे, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे आणि व्ही.शांताराम. मराठी नाटकातला जुना काळ लेखक कोल्हटकर, खाडिलकर, देवल, गडकरी व किर्लोसकर यांनी गाजवला. तो काळ संगीत नाटके आणि नाट्यसंगीताचा होता. याच काळात बालगंधर्व, केशवराव भोसले, भाऊराव कोल्हटकर व दीनानाथ मंगेशकर या गायक-कलावंतानी रंगभूमीची सेवा केली.

मराठी दुरचित्रवाणी वाहिन्या पुढीलप्रमाणे- दुरदर्शन-सह्याद्री, झी मराठी व ईटीवी मराठी. मागील काही वर्षांपासून मराठी वाहिन्यांनी लोकप्रियता मिळवली असून बहुतेक वाहिन्या २४ तास सुरु असतात. परदेशस्थ मराठी माणसंदेखिल याचा अस्वाद घेतात.

महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती भागानुसार बदलते. कोंकणच्या लोकांना भात व मासे आवडतात तर पूर्व महाराष्ट्रात गहू, ज्वारी आणि बाजरी जास्त खाल्ली जते. सर्व प्रकारच्या डाळी, कांदे, बटाटे, टॉमेटो, मिरच्या, लसूण व आले हे पदार्थ महाराष्ट्रीयन जेवणात सर्रास वापरले जातात. सामिष अन्न अनेक जणांना आवडते.

मराठी स्त्रियांचा पारंपारिक वेष नऊवारी साडी तर पुरुषांचा धोतर/पायजमा आणि सदरा असा आहे. परंतु शहरी भागात आधुनिक पेहराव केले जातात. भारतातील इतर प्रांतांप्रमाणेच क्रिकेट हा खेळ येथेही लोकप्रिय आहे. कबड्डी सुध्दा खेळली जाते.लहान मुलांत विटी-दांडू, पकडा-पकडी हे खेळ लोकप्रिय आहेत.

दिवाळी, रंगपंचमी, गोकुलाष्टमी व गणेशोत्सव हे महाराष्ट्राचे मुख्य उत्सव आहेत.पैकी गणेशोत्सव सर्वात मोठा व लोकप्रिय सण आहे जो आत देशभर साजरा केला जातो.दहा दिवस साजरा होणारा हा सण बुध्दी व विद्येचे दैवत गणपतीचा आहे. त्याचबरोबर शिव-जयंती, वटपौर्णिमा, मकरसंक्रांती, दसरा इ. सण देखिल साजरे केले जातात.


वाहतूक व्यवस्था

भारतीय रेल्वेचे जाळे राज्यभर आहे व लांबच्या प्रवासाकरीता रेल्वे हे आवडते साधन आहे. महाराष्ट्राचा बहुतेक भागास मध्य रेल्वे सेवा पुरवते. कोंकण भागात कोंकण रेल्वे तर इतर काही भागात पश्चिम रेल्वे सेवा देते. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची (एस.टी) सेवा बहुतेक शहर व खेड्यात उपलब्ध असते. एस.टीचे जाळे महाराष्ट्रभर पसरले आहे. विशेषत: ग्रामीण विभागात या बसेस लोकप्रिय आहेत.अनेक शहरात एस.टी बरोबरच खाजगी गाड्यादेखिल सेवा पुरवतात.

महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईत आहे. नागपूरपुणे विमानतळावर देशांतर्गत तसेच काही आंतरराष्ट्रीय उड्डाणेदेखिल होतात. औरंगाबाद, रत्नागिरी, कोल्हापूरसोलापूर येथेही राष्ट्रीय विमानतळे आहेत.मुंबईतल्या बंदरांपासून कोंकण किनारपट्टीवरील इतर बंदरात फेरी-सेवा (पाण्यातुन वाहतुक) होत असते. उपनगरात सहाआसनी रिक्षा लोकप्रिय आहेत. महाराष्ट्रात महामार्गांचे मोठे जाळे आहे. मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग भारतातील सर्वात पहिला टोलमार्ग आहे. मुंबई-नागपूर मार्गाचे सध्या काम सुरु आहे.महाराष्ट्रातील ३ मोठे बंदर मुंबई, न्हावा-शेवा व रत्नागिरी हे आहेत.


मुख्य शहरे

  • मुंबई-मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे.मुंबई ही भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे.मुंबईत अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. मुंबईत परप्रांतीयांचे लोंढे कायम येत असतात कारण येथे व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.
  • पुणे-शिवपूर्वकाळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे शहर ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मानली जाते.पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते.
  • नागपूर-नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. विदर्भातील सर्वात मोठे शहर.
  • औरंगाबाद-मराठवाडा विभागाचे मुख्यालय.मा.उच्च न्यायालयाचे खंडपिठ येथे आहे.
  • नाशिक-सिंहस्थ कुंभमेळ्याचे नाशिक हे भारतामधील चार धामांपैकी एक शहर आहे. दर १२ वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो.
  • कोल्हापूर- महालक्ष्मी अंबाबाई मंदिरासाठी हे प्रसिद्ध आहे.


पर्यटन

या विषयाचा विस्तृत लेख महाराष्ट्र पर्यटन


महाराष्ट्र भौगोलिक, ऐतिहासिक, धार्मिक, व्यापारी अश्या सर्व दृष्टीने संपन्न आहे. प्रवासाच्या दृष्टीने चांगले लोहमार्ग, पक्क्या सडका, चांगली आणि स्वस्त क्षुधाशांतीगृहे, धर्मशाळा यांची इथे रेलचेल आहे.महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंडळाने महाराष्ट्रातील पर्यटनव्यवसायाच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले असून डेक्क्न ओडिसी नावाची विशेष रेल्वे गाडी सुरु केली आहे. अजंठा लेणी, मुंबई, थंड हवेची ठिकाणे, किल्ले व इतर ऐतिहासिक स्थळांना पर्यटकांची विशेष पसंती असते.


संदर्भ

महाराष्ट्र-इंग्रजी विकिपीडिया


बाह्यदुवे


Now isnt this article great? well I have taken it from mr.wikipedia.org and even helped building it :)

No comments: